आज काल ती फुले वेचत नाही,
पारिजातकाचं झाड तिला आवडत नाही,
आशीच बसुन आसते कुठेतरी,
पुस्तकात डोका खुपसून,
एकटक बघत, पापणी सुद्धा हलत नाही,
वाचत काहीच नसते बहुतेक,
उगाच चिडेल म्हणुन मीही काही म्हणत नाही.

आज काल ती पाउसात भिजत नाही,
गारांचा पाउस बघुनही आनंदानं नाचत नाही,
सर आली की चिखल होईल म्हणुन चिडते, 
नुसतीच येरझार्‍या घालत बसते,
का कोण जाणे आज काल खळखळुन हसत नाही,
गुलाबाच्या पाकळ्या काढत बसते,
गालावर ओघळला तरी अश्रु पुसत नाही.

आज काल गुणगुणं ऐकु येत नाही,
गच्चीवरच्या झोपळ्यावर अलिकडे ती गात नाही,
बसुन राहते गच्चीत एकटीच,
दुपार जाते, सांयकाळ होते,
आधांरलं कितीही तरी आता घाबरत नाही,
झोपाळ्याच्या कड्या वाजत राहतात अधुनमधून
पण दबलेला हुंदका बाहेर येत नाही.

आज काल ती गांवाकडे येत नाही,
मी जावुन आलो तरी "काय खाऊ आणला?" विचारत नाही,
पाउलही न वाजवता दरवाज्यात येते,
दार उघडून वार्‍यासारखी निघुन जाते,
चुकुनही गावकडची चौकशी करत नाही,
मीच तिच्या हातात लाडु ठेवतो,
तासन्तास तो हातातला लाडु संपत नाही.

ती घडघडून काही बोलत नाही,
आणि मीही खोदुन खोदुन विचारत नाही.

– अमृता माणगांवकर